ट्रॅव्हल्स मालकांचे ठाणेदारांना साकडे
बँकेतून कर्ज काढून सावलीतील दोन सुशिक्षित बेरोजगार युवकांपुढे ट्रॅव्हल्स असोसिएशनने खोडा घातला आहे. चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महा मार्गावर ट्रॅव्हल्स चालवण्यासाठी वेळ उपलब्ध नसल्याची बतावणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे या युवकांपुढे बँकेचे कर्ज आणि कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात जय संघर्ष वाहनचालक संस्थेने ठाणेदारांना निवेदन देऊन ट्रॅव्हल्स चालवण्याची परवानगी मागितली.
चंद्रपूर-मूल-सावली-गडचिरोली या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्स धावतात. मात्र यात सावली तालुक्यातील एकाही ट्रॅव्हल्सचा समावेश नाही. ही बाब लक्षात घेऊन येथील दोन युवकांनी बँकेकडून कर्ज घेऊन दोन बसेस खरेदी केल्या. सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि चालकांचे वैध परवाने असूनही केवळ असोसिएशनच्या मनमानीमुळे या गाड्या उभ्या आहेत. संबंधित युवकांनी या मार्गावर ट्रॅव्हल्स चालवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅव्हल्ससाठी एकही वेळ रिकामी नाही, तुम्ही नवीन गाडी चालवू शकत नाही, असे सांगून त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर बस चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जय संघर्ष संस्थेने केली आहे. यावेळी नगरसेवक अंतबोध बोरकर, संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू देशमुख, विजय गुरनुले, प्रज्वल कोतपल्लीवार, रोहित गेडाम, सुधीर गुरनुले, अजय चापले, लीलाधर भांडेकर, करण दुधे, सिद्धांत दुधे आणि सुधीर आजबले उपस्थित होते.









