खेडीतील शेकडो महिलांची पाण्यासाठी पंचायत समितीला धडक – गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर

589

 

एस न्यूज नेटवर्क /सावली / सूरज बोम्मावार 

सावली – “हर घर नल, हर घर जल” अंतर्गत पाणी पुरविण्याच्या मिशनमध्ये नवीन योजनेच्या कामात पूर्वी मिळत असलेले पाणी कंत्राटदाराच्या नियोजना अभावी बंद झाल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वनवण करावी लागत आहे तर याच कामामुळे रस्ता खोदकाम केल्याने 7 महिन्यापासून बसफेरी बंद झाल्याने खेडीतील महिलांनी पंचायत समितीला धडक देत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

सावली तालुक्यातील खेडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे एक कोटी किंमतीचे काम 14 महिन्यापूर्वी असित अधीर मंडल चंद्रपूर या ठेकेदाराकडून सुरु करण्यात आले. विहिरीचे काम अर्धवट असतांना व टाकीचे कामही पूर्ण झाले नसताना गावातील वितरिका व नळ जोडणीचे काम करण्यात आले. काम करताना लहान पोकलन मशीनने खोदकाम न करता जेसीबीच्या सहाय्याने सिमेंट रोड पोडले परंतु खड्डे तसेच ठेवले त्यामुळे गावात रहदारीस अडचणी येत आहेत. मुख्य रस्ताही खोदून ठेवल्याने महामंडळाची बस बंद झाली असून विद्यार्थी, वृद्ध व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

पूर्वी टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळत होते पण विहिरीचे व टाकीचे काम पूर्ण न करता नियोजनाअभावी काम केल्याने मिळणारे पाणीसुद्धा बंद झालेले असून पिण्याचे पाणी सावलीवरून आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामही कंत्राटदाराने बंद केले असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेकडो महिलांनी पंचायत समितीला धडक दिली. गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी ठेकेदारासोबत बोलल्यानंतर लवकरच काम सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने निवेदन देत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला.